सध्याच्या काळात घरगुती व्यवसायातून काही महिलाही उद्योगाचं आपलं विश्व निर्माण करत आहेत.
अशीच काहीशी कहाणी जालन्यातील संजीवनी जाधव यांची आहे.
अवघं नववीपर्यंत शिक्षण झालेल्या संजीवनी यांनी पाच किलो आवळ्यापासून आवळा प्रक्रिया उद्योग सुरू केला.
आता याला व्यापक स्वरुप आलं असून वर्षाकाठी 25 ते 30 लाखांची उलाढाल होतेय.
जालना शहरातील बस स्थानक भागात राहणाऱ्या संजीवनी जाधव या गृहिणी आहेत.
त्यांचे पती जालन्यातील एका खाजगी कंपनीत काम करतात. कमी पगारात मुलांचे शिक्षण शक्य नसल्याने काहीतरी व्यवसाय करावा असं त्यांच्या डोक्यात सतत घोळत होतं.
कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील एक जाहिरात त्यांच्या पतीच्या लक्षात आली. त्यांनी याबद्दल संजीवनी ताईंना सांगितलं.
संजीवनी यांनी देखील तत्परतेने या प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला.
पाच दिवसाचं आवळा प्रक्रिया प्रशिक्षण घेऊन ताईंनी लगेचच प्रयोग म्हणून पाच किलो आवळ्यावर प्रक्रिया करून पाहिली. प्रक्रिया केलेला प्रयोग अतिशय सफल झाला.
आज घडीला त्यांच्याकडे जवळपास 150 क्विंटल आवळा दरवर्षी प्रक्रिया केला जातो. यातून त्यांना महिन्याकाठी दीड ते दोन लाख रुपयांची उत्पन्न होते.